रावसाहेब कसबे यांनी त्यांच्या देशीवाद : समाज आणि साहित्य या ग्रंथात नेमाडेंच्या अड्ड्याविषयी सविस्तर लिहिले आहे. अर्थात, नेमाडेंच्या अड्ड्याविषयी नेमाडेच खरे काय ते सांगू शकतील. त्या अड्ड्याविषयीचा मुद्दा बाजूला ठेवू. पण त्यानिमित्ताने रावसाहेब कसबे यांची पुढील भूमिका मात्र चुकीची वाटते. कसबे यांनी लिहिले आहे - “राजन गवस यांच्यासारखा समर्थ सर्जनशील लेखक मात्र देशीवादाच्या भोवर्यात इतका अडकला की, जीवनसंघर्षातील प्रत्यक्ष विषयाऐवजी गावरान मराठी भाषेतील आणि कृषी संस्कृतीतील शब्द, म्हणी यातच पुरता अडकला.” (पृ. 32) रावसाहेब कसबे यांनी राजन गवस यांचा अन्य ठिकाणीही गौरवाने उल्लेख केला आहे, तो भाग वेगळा; मात्र लोकभाषा व लोकसंस्कृतीविषयीचा रावसाहेब कसबे यांचा हा दुय्यमपणाचा दृष्टिकोन योग्य वाटत नाही.