एन. राम
लोकशाहीवादी भारत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 125 वी जयंती साजरी करण्यासाठी सज्ज आहे. या पार्श्वभूमीवर आधुनिक, लोकशाही व सामाजिकदृष्ट्या न्याय्य भारतासाठीच्या संघर्षातली आंबेडकरांची भूमिका अधिक उजळून निघाली आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या महान लढ्यात आंबेडकरांना समकालीन असलेल्या आणि त्यांच्या विरोधात गेलेल्या इतर अनेक प्रभावशाली राष्ट्रीय नेत्यांच्या तुलनेत आंबेडकरांचं नेतृत्व आजच्या काळात अधिकच झळाळेल दिसतं. त्यांचं जीवन, संघर्ष, अभ्यास आणि कल्पनांच्या बाबतीतली प्रयोगशीलता या सर्वांमधून अधोरेखित झालेले प्रश्न अजूनही कायम आहेत, धगधगते आहेत. खरं तर भारतीय समाजाविषयी त्यांनी उभे केलेले अनेक मूलगामी प्रश्न अजून अनुत्तरितच राहिलेले आहेत.