धारवाड. कर्नाटकातील एक सुंदर हिरवे शहर. धारवाडचे नाव घेतले की त्या परिसरातील मल्लिकार्जुन मन्सूर, गंगुबाई हनगल, द. रा. बेंद्रे, जी. ए. कुलकर्णी आणि गिरीश कार्नाड ही नावे आठवतात. अलीकडेच भाषातज्ज्ञ पद्मश्री गणेश देवी यांनीही धारवाडमध्येच आपले घर केले आहे. सांस्कृतिक श्रीमंती असलेल्या या शहराच्या प्रतिष्ठेवर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एक काळा डाग लागला. कर्नाटकमधील प्रगतिशील लेखक एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाली. पुण्यात नरेंद्र दाभोलकर यांची व कोल्हापुरात गोविंद पानसरे यांची हत्या केल्यानंतर कट्टर धर्मांध शक्तीने जणू आपला त्रिकोण पूर्ण केला होता. त्यानंतर या असहिष्णूता व अभिव्यक्ती स्वातंत्र्याला चिरडून टाकणार्या वातावरणाचा निषेध म्हणून देशभरातील लेखक, विचारवंत आणि कलावंतांनी साहित्य अकादमी व राज्य शासनांनी दिलेले पुरस्कार परत केले होते.