महेंद्र कदम हे 2000 नंतरच्या कथन परंपरेतील एक आश्वासक नाव. भाषाविज्ञान, शैलीविज्ञान आणि समीक्षात्मक लेखनाबरोबर त्यांचे सर्जनशील लेखनही वैशिष्ट्यपूर्ण आहे. 'धूळपावलं' ही त्यांची पहिली कादंबरी ग्रामजीवनातील विविध स्तरांचा शोध घेते. समकालीन ग्रामजीवन नेटक्या पद्धतीने अभिव्यक्त करते. या कादंबरीत उच्चभ्रू मराठा समाजाकडून शोषणाचे बळी ठरलेल्या अनेक कुटुंबांची कथा आणि व्यथा येते. वर्तमानाच्या कचाट्यात ही कुटुंबे पूर्णत: पिचली आहेत. अस्मानी-सुलतानी संकटांमुळे त्याचं जगणं शोकपर्व झालं आहे. तरीही नव्याने उभी राहण्याची त्यांची धडपड कौतुकास्पद वाटते. त्यांचा आशावाद अधिक आश्वासक वाटतो. आपल्या परीने ते जगण्याची तड लावू पाहतात.